देशात आनंदोत्सव   

पेढे वाटून आणि फटाके फोडून दिवाळी साजरी

नवी दिल्ली :  पाकिस्तानी दहशतवाद्यांचे कंबरडे मोडणारे ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याचा आनंद देशवासीयांनी बुधवारी उत्साहात साजरा केला. पेढे वाटून आणि फटाके फोडून त्यांनी काल दिवाळीच साजरी केली. भारत माता की जय, जयहिंदच्या घोषणा देत भारतीय रस्यावर उतरले. कारवाईमुळे सर्वत्र देशप्रेमाची लाट पसरली होती. 
 
जम्मू काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत अनेक राज्यांत काल आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पहलगाम हल्ल्याविरोधातील निर्णायक कारवाईबद्दल नागरिकांनी आनंद व्यक्त केला. आकाशात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. दहशतवाद्यांचे तळ नष्ट करण्याची कारवाई भारतासाठी एक महत्त्वाची घटना ठरली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अशा कठोर करवाईची नागरिक वाटच पाहात होते. दहशतवादी तळ नष्ट झाल्यांनंतर देशात आनंदाची लाट पसरली. त्याद्वारे नागरिकांमध्ये  हितसंबंधांचे रक्षण करण्याचा दृढनिश्चय दिसून आला. विविध सामाजिक व्यासपीठांवर व्यापक चर्चा झाली आहे. पहलगाम हल्ल्यामुळे अनेकांना धक्का आणि दु:ख झाले होते. निरपराध व्यक्तींची दहशतवाद्यांनी त्यांच्या पत्नी समोर हत्या केली होती. जा तुला मारत नाही, मोदी यांना सांग, अशा शब्दांत  त्यांना धमकावले होते. त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळलीं होती. पहलगामचा बदला भारत केव्हा घेणार ? या प्रतीक्षेत ते होते. अखेर बुधवारची सकाळ त्यांच्यासाठी तो आनंदाचा क्षण घेऊन येणारा ठरला. त्यांच्या आनंदाला उधाण आले. जयहिंद, ऑपरेशन सिंदूर, भारत माता की जय अशी वाक्ये आणि सैन्य दलाच्या कारवाईचे अभिनंदन करणारी पोस्ट समाज माध्यमांवर हा हा म्हणता झळकली.
 
पहलगाम हल्ल्यानंतर दु:खात देश बुडाला होता. मात्र आक्रमक  कारवाई होताच  त्याचे रुपांतर आनंदाच्या क्षणात झाले. २५ जणांचे प्राण जाणे देशासाठी एक मोठा धक्काच होता. भविष्यातील धोके टाळण्यासाठी दहशतवाद्यांना नेस्तनाबूत करावे, अशी मागणी जोर धरत होती. ती ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पूर्ण झाली. याचा एक वेगळाच आनंद देशात पसरला. अनेक जण राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करणारी कारवाई म्हणून त्याकडे पाहात आहेत. अवघ्या १५ दिवसांत जलद आणि निर्णायक कारवाई करुन सरकारने कठोर पाऊल उचलले, याचे कौतुक झाले आहे. सैन्य दलाच्या पराक्रमाची सर्वत्र चर्चा झाली. देशाच्या अनेक भागांत फटाके आणि उत्सवासारखे वातावरण दिसून आले. नागरिक भारत माता की जय, जयहिंदचा नारा देत रस्त्यावर उतरले. कारवाईमुळे पहलगाम हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांना  न्याय मिळाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. आता नागरिकांनी स्वयंसुरक्षा आणि पुढील घटना रोखण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत याची खात्री देत अधिकारी दक्ष आहेत. ऑपरेशन सिंदूरच्या यशाकडे कायमस्वरूपी शांतता आणि सुरक्षिततेच्या दिशेने भारताने टाकलेले एक पाऊल म्हणून पाहिले जाते.
 

Related Articles